संताप : परिक्षेच्या कालावधीत शिक्षकांचे प्रशिक्षण

सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय : शिक्षक भारतीचे अध्यक्ष साहेबराव पवार यांचा सवाल

यवतमाळ : सध्या बारावी दहावीची परीक्षा सुरु असून, सर्व शिक्षक व्यस्त आहे. मात्र अशा परिस्थितीत शिक्षण विभागाने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. ऐन परिक्षेच्या दरम्यान अशा पध्दतीने शिक्षकांना वेठीस धरल्या जात असल्याने सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असा सवाल शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव पवार यांनी केला आहे.

३०% शिक्षकांचे प्रशिक्षण होणार

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पूणे या कार्यालयामार्फत राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृध्दी तालुकास्तरीय प्रशिक्षण इयत्ता ६ ते १२ वी ला अध्यापन करणारे शिक्षकांचे व मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण जगदंबा इंजिनिअरींग कॉलेज किन्ही येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण तीन टप्यांमध्ये होत आहे. शाळेतील इयत्ता ६ ते १२ वीला शिकविणाऱ्या एकूण शिक्षकसंख्येच्या ३०% शिक्षकांचे पहिल्या टप्यात प्रशिक्षण होणार आहे. उर्वरीत शिक्षकांचे पूढील दोन टप्यांमध्ये प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. एकही शिक्षक प्रशिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. प्रशिक्षणाकरीता उपस्थित राहणाऱ्या सर्व शिक्षकांनी पूर्ण वेळ प्रशिक्षणामध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे.

२० फेब्रुवारी पासून पहिला टप्पा

सदर प्रशिक्षण पहिला टप्पा दिनांक २० ते २५ फेब्रुवारी २०२५ (रविवार दि.२३ वगळून) प्रशिक्षण दुसरा टप्पा दिनांक २७ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२५ सलग पाच दिवस प्रशिक्षण तिसरा टप्पा दिनांक ४ ते ८ मार्च २०२५ सलग पाच दिवस होणार आहे. प्रशिक्षणाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५.०० पर्यन्त ठेवण्यात आली आहे.

तुघलकी निर्णय

सध्या बारावी तसेच दहावीची परिक्षा सुरु असल्याने सर्वच शिक्षक अत्यंत व्यस्त आहे. बारावीचे पेपर तपासण्याचे काम सुध्दा सुरु झाले आहे. याशिवाय कॉपीमुळे वादग्रस्त ठरलेल्या केन्द्रावर केन्द्र संचालक तसेच पर्यवेक्षक यांची अदलाबदल करण्यात आल्याने अनेक शिक्षकांना तीस ते पस्तीस किलोमीटर सेंटरवर जावे लागत आहे. त्यामुळेच सरकारने घेतलेला हा तुघलकी निर्णय अत्यंत त्रासदायक ठरणार असल्याने शिक्षकांनी आपला रोष व्यक्त केला आहे.

गुणवत्तेवर विपरीत परिणाम

परिक्षेची जबाबदारी पार पाडून शिक्षक हे शाळेतील वर्ग पण घेतात. त्यामुळे प्रशिक्षणाची ही लगीनघाई परिक्षेदरम्यान कशाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारच्या या अशा धोरणामुळे शिक्षण विभागाचे फक्त टारगेट पुर्ण होत असले तरी गुणवत्ता राखली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होते. अशी प्रतिक्रीया साहेबराव पवार जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती यांनी दिली.

 

Post a Comment

0 Comments