नोकरी भरतीवर संक्रांत : राज्यातील आठ जिल्ह्यातील शिक्षक भरती बंद

बिंदूनामावलीत सर्व विभागांच्या तपासण्या बंद असल्याचा परिणाम

राहुल वासनिक / तहलका टाईम न्युज नेटवर्क

यवतमाळ : शिक्षण विभागातील शासकीय व खासगी संस्थांमधील बिंदूनामावली अद्ययावत नाही. बिंदूनामावतील सर्व विभागांच्या तपासण्या बंद आहे. त्यामुळे यवतमाळसह राज्यातील अन्य आठ जिल्ह्यातील मधील शिक्षक भरतीवर संक्रांत आली आहे. विशेष म्हणजे आठही जिल्हे आदिवासी बहुल असून, शिक्षणाचा खेळखंडोबा सुरु असल्याचे दिसून येते.

नविन जीआर काढला नाही

राज्यात एससीबीसी आरक्षण 27 फेब्रुवारी 2024 रोजी लागू झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यांसह राज्यात नवीन बिंदूनामावली कार्यान्वित झाली. मात्र राज्यातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, रायगड आदी आदिवासीबहुल जिल्ह्यांसाठी अजून सामान्य प्रशासन विभागाने स्वतंत्र जीआर काढला नाही. नवीन आरक्षणानुसार प्रत्येक जिल्ह्यातील आदिवासींचे आरक्षण वेगवेगळे लागू होते, तो जीआर न काढल्यामुळे सर्व विभागाच्या बिंदूनामावली तपासण्या बंद आहेत. बिंदूनामावली तपासली गेली नाही तर पदे निघणार नाहीत; नोकर भरती होणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना रोजगार मिळणार नाही. रोजगारासाठी त्यांना आठ जिल्हे सोडून इतर जिल्ह्यात जावे लागणार आहे.

यवतमाळ जिल्हा पदभरतीतून बाद

शिक्षण विभागातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी खासगी व शासकीय शाळांमध्ये पवित्र पोर्टल कार्यान्वित झाले आहे. परंतु, जिल्ह्याची बिंदूनामावली अद्ययावत नाही. त्यामुळे यवतमाळ जिल्हा या पदभरतीमधून बाद झालेला आहे. येथे कुठलीही शिक्षकांची पदे भरली जाणार नाहीत. स्थानिकांना शिक्षकाची नोकरी मिळणार नाही.

संस्था चालकांनी घेतली ना. उईके यांची भेट

27 फेब्रुवारी 2024 नंतर लागू झालेल्या एससीबीसी आरक्षणाचा उल्लेख करीत सामान्य प्रशासनाने तत्काळ आठ जिल्ह्यांचे बिंदूनामावली तपासण्याचा स्वतंत्र जीआर तत्काळ काढावा, अशी मागणी खासगी संस्था चालकांनी आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके यांच्याकडे केली आहे. यावेळी खासगी संस्थाचालक संस्था महामंडळाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, जयंतराव घोंगे, अनिल गायकवाड, सिद्धार्थ भारती, मिलींद रामटेके, राजेंद्र डांगे व प्रकाश भुमकाळे, जगदीश वाधवानी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments