आक्रोश : विधानसभेला घेराव घालणार

 बेरोजगारी, जातीयवाद, गुन्हेगारी, शेतक-यांच्या प्रश्नांवर वेधणार सरकारचे लक्ष 

यवतमाळ : बेरोजगारी, जातीयवाद, राजकीय गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार, शेतक-यांची दुरावस्था यासह विविध प्रश्नांवर सरकारला घेरण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस पुण्यातून पदयात्रा काढणार आहे. ही यात्रा मुंबईला गेल्यानंतर विधानसभेला घेराव करणार आहे. या आंदोलनात यवतमाळ जिल्हयातील शेकडो युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसने केले आहे.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची लालमहल, पुणे ते विधानभवन, मुंबई या मार्गावर पदयात्रा प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली आहे. ही पदयात्रा १५ मार्च ते १९ मार्च या कालावधीत पार पडणार असून, १९ मार्च रोजी हजारो कार्यकर्त्यांचा उपस्थितीत विधानभवनावर घेराव केले जाणार आहे. या पदयात्रेत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब व प्रभारी अजय छिकारा, एहसान खान सहभागी असतील. राज्यातील सर्व प्रमुख नेते टप्यानुसार पदयात्रेत सहभागी होणार आहे. १५ मार्च रोजी पदयात्रेची सुरुवात लालमहल पासून सुरू होईल, ज्यात विधान परिषदेचे गटनेते सतेज बंटी पाटील व माजी मंत्री विश्वजीत कदम उपस्थित असतील. राज्य अध्यक्ष हर्षवर्धन सापकाळ आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथाला सुद्धा सहभागी होतील. अशी माहिती युवक काँग्रेसचे सरचिटणीस व संघटनप्रमुख श्रीनिवास नालमवार, यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रमोद बगाडे यांनी दिली आहे.

समस्यांवर प्रकाश टाकणार

या आंदोलनाच्या माध्यामातून वाढलेली बेरोजगारी, रोजगाराच्या कमी झालेल्या संधी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारचं होत असलेले दुर्लक्ष, राजकीय गुन्हेगारी व गुन्हेगारांना सत्ताधारी राजकीय पक्षांचा आश्रय याकडे लक्ष वेधण्यात येणार आहे. याशिवाय जातीयवाद, महिला अत्याचार, शेतक-यांच्या प्रश्नांकडे होत असलेले दुर्लक्ष यासह विविध विषयावर सरकारला धारेवर धरले जाणार आहे. या आंदोलनात यवतमाळ जिल्हयातील मोठया संख्येत युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रमोद बगाडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments