यवतमाळ – विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीवर विश्वास दाखवत आजपर्यंतच्या इतिहासातील बहुमत मिळवून दिले. त्यानिमित्त जनतेचे आभार मानण्यासाठी शिवसेना पक्ष मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरूवारी (३ एप्रिल) यवतमाळ येथे आले होते. त्यांच्या उपस्थितीत स्थानिक पोस्टल मैदानात जाहीर सभा झाली. पोस्टल ग्राऊंडवरील गर्दीचे आजपर्यंतचे सर्व विक्रम या सभेने मोडले. सभेनंतर सर्वत्र या रेकॉर्ड ब्रेक गर्दीचीच चर्चा रंगली आहे.
शिवेसनेचे नेते, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी तालुकास्तरावर शिवसैनिकांची आढावा बैठक घेवून पंधरा दिवसांपासून वातावरण निर्मिती केली. पायाला भिंगरी लावून ते जिल्ह्यात फिरले. सभेत उसळलेला जनसागर पाहून आपल्या परिश्रमाचे चीज झाले, अशी प्रतिक्रिया ना. संजय राठोड यांनी दिली. विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच यवतमाळ येथे आले. त्यामुळे त्यांना बघण्यासाठी, ऐकण्यासाठी, भेटण्यासाठी या सभेस जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आले होते. या सभेने शिवसैनिकांमध्येही जोश निर्माण केला. शिवसैनिकांसह जिल्हाभरातून नागरिक आणि भगिनी मोठ्या संख्येने सभेसाठी आल्या. सभेला उपस्थित बहिणींचे विशेष आभार मानताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही, हा विश्वास देतानाच भविष्यात बहिणींच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणू, अशी ग्वाही दिल्याने उपस्थित बहिणींनी एकनाथ शिंदे यांचा जयघोष करत प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना प्रतिसाद दिला. यापूर्वी १९९९-२००० मध्ये अभिनेते अमिताभ बच्चन यांची रेकॉर्ड ब्रेक सभा पोस्टल मैदानात झाली होती. त्यावेळी मैदान पूर्ण भरले आणि सर्वत्र नागरिक अमिताभ बच्चन यांना बघण्यासाठी, ऐकण्यासाठी आतूर असलेले दिसत होते. अशीच किंबहूना त्याहीपेक्षा अधिक गर्दी गुरूवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार यात्रेच्या जाहीर सभेस पोस्टल मैदानाने अनुभवली. गर्दीचे मोजमाप आणि सुरक्षेसाठी तैनात पोलीस यंत्रणेतील कर्मचारीही २५ वर्षांनंतर पोस्टल मैदानावर एवढी खचाखच भरलेली माणसांची गर्दी दिसल्याचे कार्यक्रमानंतर एकमेकांना सांगत होते. पोस्टल मैदानाचे चारही भाग, दोन्ही बाजूच्या गॅलरी आणि फूटपाथवर सर्वत्र माणसंच माणसं दिसत होती. जवळपास ५० हजारांवर नागरिक या सभेस उपस्थित होते.
शिवसेनेच्या वतीने या कार्यक्रमाचे व्यवस्थापन आणि नियोजनही चोख करण्यात आले होते. प्रचंड गर्दी होवूनही कुठेही नियोजनाचा अभाव आढळला नाही. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम सुरळीत, शांतपणे आणि विशेषत सुरक्षितपणे पार पडला. सभेनंतरही कुठेच गोंधळ झाला नाही. नागरिक शिस्तीत वाहनतळाकडे गेले. महिलांना कुठेही असुरक्षितता वाटली नाही. बैठक व्यवस्था, पुरूष, महिला, मान्यवर, पत्रकार, अशी विभागवार रचना, बॅरिकेट्स आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या सोबतीला गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व नियोजन करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी झटत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सांमत सहा वाजताच्या सुमारास हेलिकॉप्टरने यवतमाळला आले. त्यावेळी हे हेलिकॉप्टर पोस्टल मैदानावरून घिरट्या घालत आले. हेलिकॉप्टरमधून पोस्टल मैदानात माणसांचा पूर आल्याचे दिसत होते. मुंबईच्या शिवाजी मैदानातील सभेसारखी या सभेची सुटसुटीत आखणी, मांडणी भासत असल्याची प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काही शिवसेना पदाधिकाऱ्यांजवळ दिली. ही सभा उच्चांकी गर्दीची राहिली, असेही ते म्हणाले. ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेल्या छायाचित्रांमधूनही या सभेतील गर्दीचे सौंदर्य अधिक ठळकपणे दिसत आहे.
0 Comments